माझ्या मते शेती दोन प्रकारची..
एक व्यावसायिक शेती
आणि दुसरी
सुखी समाधानी जगण्यासाठी
गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली शेती.
हल्ली जास्तीत जास्त व्यावसायिक शेती करणारेच दिसतात. गंमत म्हणजे अशी शेती करताना त्यासंबंधीचे व्यावसायिक प्रशिक्षण बहुतेक वेळा न घेता केली जाते. त्यामुळे साहजिकच अनेक धोके संभवतात. नुकसान होऊ शकते. याच्या अजूनही अनेक बाजू आहेत.
शेतीला आधुनिक करण्याच्या नावाखाली शेतकऱ्याला गंडवण्याचेच उद्योग सुरू आहेत. आणि आपण मागे तर पडणार नाहीत या भीतीने शेतकरीही बळी पडत चाललाय. पर्यायाने शेतकऱ्या व्यतिरिक्त इतर व्यावसायिक व्यापारी कारखानदार असे घटक गब्बर झालेत.
दुसरा जो शेतीचा प्रकार मी मांडतोय तो हल्ली कुणी फारसा करत नाही.
इथे लोणार जवळ हिरडव गावात विलास पोफळे नावाचे एक शेतकरी मी बघितले.
त्यांचा 100% शेतामध्ये रहिवास आहे. त्यांच्या शेतात जवळपास सगळ्या प्रकारचा थोडा थोडा भाजीपाला, थोडे थोडे फळझाडे, काही कोंबड्या, बटेर, आहेत.
गुराढोरांच्या शेणापासून नाडेप, कंपोस्ट, गांडूळ अशा प्रकारची खते दररोज तयार होतात. शिवाय जीवामृत, गोमूत्र वगैरे गोष्टी इतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना दररोज विकल्या जातात.
भाजीपाला अंडी कोंबड्या गोमूत्र जीवामृत सेंद्रिय खत अशा वेगवेगळ्या गोष्टी दररोज विकून किमान तीन ते पाच हजार रुपये उत्पन्न ते रोजचे कमावतात. बाकी शेतातलं नगदी उत्पन्न दर तीन-चार महिन्याला ठोक मिळते.
ते शेतात राहून दररोज पूर्ण लक्ष घालून हे काम करत असल्यामुळे एवढे शक्य झालं.
हे काही एका रात्रीतून शक्य झालं नाही यासाठी त्यांनी खरोखरच कष्ट घेतलेत.
शेतातून दररोज उत्पन्न काढणारा शेतकरीच सुखी राहू शकतो दर तीन महिन्यांनी नव्हे.
No comments:
Post a Comment